Sunday, November 13, 2011

आहाराचे वेळापत्रक

आपण घेत असलेला आहार हा सामान्यपणे द्रवरूप आणि घनरूप अशा दोन प्रमुख प्रकारांत मोडतो. त्यामध्ये द्रवरूप आहार म्हणजे पाणी पिणे, दूध पिणे याबद्दल सविस्तर चर्चा आपण पूर्वी केलेली आहे. पण आपण घेत असलेल्या घनरूप आहाराच्या म्हणजेच नाश्ता (न्याहारी) आणि भोजन यांच्या वेळांबद्दल आपण आरोग्याचे नियम जाणून घेण्याचा या रुचिपालटमध्ये प्रयत्न करणार आहोत.
आधीचे पचल्यावर दुसरे खा
मुळात आपण दिवसभरात केव्हा खावे, असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. हल्ली मधुमेह, हृदयविकार इ.चे प्रमाण वाढत चालले असल्याने त्या रुग्णांना आहाराचा एक तक्ताच तयार करून दिलेला असतो आणि त्यानुसार ही मंडळी आपली गुजराण करत असतात. पण मुळात असे विकारच होऊ नयेत म्हणून आपणच स्वयंशिस्त पहिल्यापासूनच आपल्या आहाराचे वेळापत्रक ठरवले आणि ते पाळले तर पुढे विचित्र रोगांच्या आहाराचे तक्ते बाळगण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
सकाळी उठल्याबरोबर काही जणांना भूक लागत असते, तर काहींना एक उपचार म्हणून न्याहारी घ्यायची असते. मुळात सकाळी रोज आपले पोट स्वच्छ झाल्याशिवाय आपण कोणताही आहार घेऊ नये. रात्रीचे खाल्लेले पचून मलविसर्जन झाल्यावर मग पुढचा आहार घ्यावा. एरवी दिवसादेखील आधीचे खाल्लेले पचल्याची जाणीव झाली, भूक लागली की मगच खावे.
जेवण पित्तकाली घ्या..
दिवसाचे जेवण आपण किती वाजता करावे? असाही प्रश्न आपल्याला भेडसावत असतो. दिवसात सकाळी १0 ते दुपारी २ हा पित्ताचा काळ म्हणून शास्त्राने सांगितला आहे. शरीरातील पचनक्रिया करण्याचे मुख्य कार्य पित्तदोषाचे असते. त्यामुळे सामान्यत: पित्तकाली भोजन करण्याची सवय ठेवावी. म्हणजे पचन योग्य आणि सुलभ पद्धतीने होते. मग ज्यांना शक्य असेल आणि भूक लागत असेल अशांनी सकाळी १0 च्या सुमारास काही न्याहारी घेण्यास हरकत नाही. आणि मग दुपारी १ ते २ या वेळात जेवण्याची सवय पक्की ठेवावी.
दोन खाण्यांमध्ये किमान तीन तास ठेवा
दिवसाच्या दोन खाण्यात आपण किमान तीन तास अंतर ठेवायला हवे. आणि सहा तासांपेक्षा अधिक वेळ आपण त्या दोन खाण्यात अंतर ठेवता कामा नये, हा शास्त्रादेश आपण पाळायला शिकले पाहिजे. याच दृष्टीने सकाळी १0 ला न्याहारी आणि दुपारी २ च्या आत जेवण, हे वेळापत्रक आरोग्यदायी ठरते.
खूप सकाळी जेवण नको!
कार्यालयात काम करणार्‍या अनेकांना सकाळी साडेआठ ते ९ च्या सुमारास जेवण करून बाहेर पडण्याची सवय असते. पण सकाळची वेळ ही कफदोषाची असल्याने या काळात खाल्लेले पचायला फारसे सुलभ नसते आणि आपल्या शरीराच्या घड्याळालाही ते हिताचे ठरत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी सकाळी थोडी न्याहारी करून डबा घेऊन जावे आणि पित्तकाळी ‘लंचटाईम’ पाळावा.
अध्यशन टाळा
अध्यशन याचा अर्थ पूर्वी खाल्लेले पचण्याआधीच नवीन आहार घेणे. यालाच व्यवहारात आपण अधाशीपणा म्हणतो. असे अध्यशन टाळणे हे प्रकृतीच्या दृष्टीने खूप आवश्यक असते. तसे केले नाही तर आपल्या पचनशक्तीवर ताण येतो. अजीर्णसारखे विकार उद्भवतात.
अधाशीपणाचे दुष्परिणाम
आपण दोन खाण्यात तीन तासांपेक्षा कमी अंतर सातत्याने ठेवले आणि पूर्वीचे पचण्याआधीच खाण्याची सवय ठेवली, तर त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, असे भारतीय वैद्यकशास्त्र सांगते. माधवनिदान हा ग्रंथ यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. अधाशीपणा केला तर त्यामुळे पुढील विकार आपल्याला संभवतात.
जुलाब होणे, अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे), हृदयविकार, त्वचारोग, मूत्रकृच्छ (मूत्रप्रवृत्तीला त्रास होणे), रक्तप्रदर (स्त्रियांमध्ये खूप अंगावर जाणे), वेदना होणे.
वरील विविध दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण अध्यशन टाळले पाहिजे.
नोकरी करणार्‍या मंडळींना आपले वेळापत्रक पाळणे त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असली तर शक्य होईल. पण व्यावसायिक मंडळींमध्ये मात्र खाण्याच्या वेळा पाळण्यापेक्षा टाळण्याचीच वेळ बर्‍याचदा येते आणि मग त्याचेही आरोग्यावर होणारे घातक परिणाम भोगावे लागतात. विशेषत: ही मंडळी सकाळी काहीतरी खाऊन घराबाहेर पडली की मग दुपारी दोन, तीन, चार अशा वेळेस जेवण करतात. याने जेवण्याची वेळ टळते आणि मग त्यांना उपासमारही होते, पित्त भडकते, वायूही त्रास देतो, डोकेदुखी निर्माण होणे, वजनावर परिणाम होतो, चिडचिड होते, काही वेळा घरातील स्त्रियाही अशाच प्रकारे जेवण्याच्या वेळा (उगीचच) टाळतात. मग पुढे त्याचाही त्रास होतो तेव्हा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपल्या रोजच्या आहाराच्या वेळा नीट सांभाळणे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे.

वैद्य विजय कुलकर्णी
[लोकमत १३/११/२०११ ]

2 comments:

  1. सर, ह्याच्यात दारू कधी प्यायची ते दिलंच नाही म्हणजे हेय वेळापत्रक माझ्या मते चुकीचे आहेय

    ReplyDelete
  2. सर,खूपच सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली. धन्यवाद

    ReplyDelete