Tuesday, June 28, 2011

बदिउज्जमान खावर यांच्या कविता


सत्य मी जेव्हा लिहाया लागतो
हात माझा थरथराया लागतो

त्यास जेव्हा पाहतो जवळून मी
तो मला माझा दिसाया लागतो

आजही झालो ऋतूने धुंद की,
आजही मी गुणगुणाया लागतो

रोज हल्ली चालते माझे असे
झोपलो की बडबडाया लागतो

वाटते जेव्हा रडावेसे मला
त्याचवेली मी हसाया लागतो

संकटांनी झोडले ‘खावर’ तरी
मी पुन्हा उठुनी जगाया लागतो

बदिउज्जमान खावर

=============================================================

तीच तीच दृश्ये अन् तेच तेच देखावे
सर्व सारख्या वस्त्या; सर्व सारखीच गावे

कोरड्या नद्या सर्व, कोरडी मने सारी
श्रावणातही कोठे न राहिले ओलावे

रोज रोज शब्दांचा खेळ हा कशासाठी?
रोज रोज कसले हे अर्थहीन मेळावे

रंग हा असा आहे, गंध तो तसा आहे
रोज हे वसंताचे एकतोय सांगावे

एकही गुन्हा त्याचा सिध्द जाहला नाही
व्यर्थ शेवटी ठरले सर्व आमुचे दावे

सत्य हेच आहे, ती आमुची कथा होती
आमुची जरी नव्हती त्या कथेतील नावे

बदिउज्जमान खावर

खावर - चार माझी अक्षरे या संग्रहातून

==================================================================

जो पाहतोय त्याला दिसतोय वेगळा मी
सारेच देव येथे; माणूस एकटा मी

पायात गुंतलेल्या रस्त्यास काय सांगू
का न् राहिलो कुठल्या वळणावर् उभा मी

इथल्या परंपरेशी जुळले ना सख्य माझे
या बेगडी जगाचा झालो न सोयरा मी

रस्ते अजून इथले माझ्या न ओळखीचे
शहरामध्ये जरी या, ना राहिलो नवा मी

माझा बचाव माझ्या हाती न राहिलेला
प्रेमात रंगलो; हा केला खरा गुन्हा मी

बदिउज्जमान खावर

==================================================================

काजव्यांना अंतरीची वेदना सांगू कशी?
एकटा मी, पावसाची रात ही काढू कशी?

आसवाचा थेंबही नेत्रात नाही राहिला
ही मनाला जाळणारी आग मी विझवू कशी?

बोचणारया़ कंटकांनी व्यापलेले रान हे
मी जरी वेडा फुलांचा; मी फुले वेचू कशी?

साहवेना आणखी आता जऱी काळोख हा
रोशनीसाठी घराला आग मी लावू कशी?

कोंडलेले शब्द माझे माझिया छातीमध्ये
दूर गेले लोक, त्यांना साद मी घालू कशी?

सावलीसुध्दा न 'खावर' सोबतीला
हाय मी अंधारलेली वाट मी कापू कशी?

बदिउज्जमान खावर

===============================================================

सिद्धार्थही न उरलो मी बुद्धही न् झालो
सोडून राजवाडा नाहक वनात आलो!

माझी मला ठिकाणे माहीत सर्व होती
कोठेच तरीही नाही मला मिळालो

आला असा अचानक पाऊस मध्यरात्री
बाहेरच्या सरींनी मी आत चिंब झालो

माझ्यावरी तुझे हे रुसणे उगीच आहे
काहीच वावगे मी नाही तुला म्हणालो

लोकांस भेटतांना आले रडू मलाही
सोडून गाव जेव्हा मी यात्रेला निघालो

माझ्या विरुद्ध 'खावर' फिर्याद मीच केली
घेउन मीच मजला न्यायालयात आलो

बदिउज्जमान खावर

=================================================================

मी राहतो कुठे हे सांगू कसे जगाला?
पत्ता अजून माझा नाही मला मिळाला

मन पेटवून केली होळी जरी मनाची
छातीमधून माझ्या ना धूरही निघाला

हे दुःख अंतरीचे बोलू तरी कुणाशी?
ही वेदना मनाची सांगू तरी कुणाला!

कोठे असेल त्याचा मुक्काम कोण जाणे
शोधू कुठे कुठे त्या भटक्या मुशाफिराला?

जातो जिथे जिथे तो वेषात प्रेषिताच्या
छळतात लोक सारे वेडा म्हणून् त्याला

उरला अता न "खावर" तो रंग मैफिलीचा
गझला नव्या नव्या या लिहीतोस तू कशाला?

बदिउज्जमान खावर ("चार माझी अक्षरे" या संग्रहातून)

=======================================================================

रानात हवा गाते मल्हार तुझ्यासाठी
बागेत फुलांचा हा शृंगार तुझ्यासाठी

प्रत्येक नवा मौसम फुलवून तुला जातो
घेतात ॠतू सारे आकार तुझ्यासाठी

जाशील तेथे गात्रे न्हातील उजेडाने
कोठेच नसे आता अंधार तुझ्यासाठी

बदिउज्जमान खावर


Monday, June 27, 2011

ग्रेस यांच्या कविता



पूर्ण नाव : माणिक सीताराम गोडघाटे 
जन्म : १० मे १९३७  नागपूर 
माणिक गोडघाटे हे कवी ग्रेस म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध आहेत. परमेश्वरी कृपा या अर्थाने त्यांनी हे साहित्यिक नाव धारण केले आहे. ’संध्याकाळच्या कविता’ या १९६७ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. पाच काव्यसंग्रह आणि तितकेच ललितलेखसंग्रह ही साहित्यिक ग्रेस यांची (सर्वांना सहजपणे कळू शकणारी) कामगिरी आहे. "बाईला समजून घेणे हा माझ्यामधील पुरूषाचा पुरुषार्थ आहे" असे त्यांनी कित्येकदा जाहीरपणे सांगितले आहे. "परमेश्वराने विश्व निर्माण करताना चुका केल्या आहेत, त्या सुधारणे हा माझ्यासारख्या कलावंताचा धर्म आहे" असेही त्यांचे सांगणे आहे. आजमितीला ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे त्या सर्व मराठी कवींपैकी ’समजण्यास अत्यंत अवघड’ इथपासून ते ’केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही’ इथपर्यंतच्या टीका त्यांच्या कवितांवर झालेल्या आहेत.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
संध्याकाळच्या कविताकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९६७
राजपुत्र आणि डार्लिंगकवितासंग्रहअमेय प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन१९७४
चर्चबेलललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७४
चंद्रमाधवीचे प्रदेशकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७७
मितवाललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९८७
सांध्यपर्वातील वैष्णवीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९९५
संध्यामग्न पुरुषाची लक्षणेललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०००
मृगजळाचे बांधकामललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००३
सांजभयाच्या साजणीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००६
वाऱ्याने हलते रानललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००८
कावळे उडाले स्वामीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०१०
निष्पर्ण तरुंची राई


भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...



~ग्रेस 
ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे.
============================================================
घर थकले संन्यासी 


घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
~ग्रेस
============================================


ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता




चित्रपट : निवडुंग 
गीत : ग्रेस 
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर
=========================================


Saturday, June 25, 2011

तुकारामांचे निवडक अभंग

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि स्वरूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥
तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥

==============================================

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें । पक्षी ही सुस्वरे आरवीती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रिडा करी ॥३॥
कंथा कमंडलू देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरि कथा भोजन परवडी विस्तार । करुनी प्रकार रुची सेवू ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥६॥

===============================================
अमृताहूनि गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा कां बा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करू यांसी । का रूप ध्यानासी न येत तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जति हरिनामाच्या कीर्ति । नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

===============================================
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥
आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज । आम्हासी सहज द्यावे आता ॥३॥
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडिता सकळ नाही आम्हा ॥४॥

================================================

कन्या सासुरासी जाये,मागे परतोनी पाहे|
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा||
चुकिलया माये, बाळ हुरुहुरु पाहे|
जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी||

================================================
रुपे सुंदर सावळा गे माये वेणु वाजवी | वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु | वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी |वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी | करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥ 

=================================================

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥ 

=================================================
नामाची आवडी तोचि जाणा देव| न धरी संदेह काही मनी||
ऐसे मी हे बोलत नाही नेणतां| आनुनि संमता संतांचिया||
नाम म्हणे तया आणीक साधन| ऐसे हे वचन बोलों नये||
तुका म्हणे सुखे पावे य वचनी| ज्याचीं शुद्ध दोन्ही मायेबाप||

=================================================
राजस सुकुमार मदनाचा पुतळा| रविशशिकळा लोपलिया||
कस्तुरी मळवट चंदनाची उटी| रूळे माळ कंठी वैजयंती||
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें| सुखाचे ओतले सकळ ही||
कासे सोनसळा पांघरे पाटोळा| घननीळ सांवळा बाइयानो||
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा| तुका म्हणे जीवा वीर नाही||

=================================================

येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥
रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥

=================================================
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ||१||
पावतसे महासंकटी निर्वाणी | रामनाम वाणी उच्चारीता ||२||
उच्चारिता नाम होय पापक्षय | पुण्याचा निश्चय,पुण्यभूमी ||३||
पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे |पापिया नाठवे काही केल्या ||४||
काही केल्या तुझे मन पालटेना | दास म्हणे जना,सावधान ||५|| 

=================================================
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ||१||
पावतसे दशभुजा उचलून | माझा पंचानन कैवारी ||२||
कैवारी देव ,व्याघ्राच्या स्वरूपे | कोपे भूमंडळ जाळू शके ||३||
जाळू शके सृष्टी उघडिता दृष्टी | तेथे कोण गोष्टी आणिकांची ||४||
आणिकांची महती शंकराखालती | वाचविली क्षिती,दास म्हणे ||५||

=================================================
कैवारी हनुमान, आमुचा ॥
पाठीं असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरूनिया अभिमान
द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण 

=================================================
आम्ही काय कुणाचे खातों । श्रीराम आम्हाला देतो
बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट
नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनी बेडकी
सिंधु नसता तिये मुखीं । पाणी कोण पाजीतो
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें
दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवितो

=================================================
मन हे विवेकें विशाळ करावें । मग आठवावें परब्रह्म ॥
परब्रह्म मनीं तरीच निवळें । जरी बोधें गळे अहंकार ॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥
समाधान घडे स्वरूपीं राहतां । विवेक पाहतां नि:संगाचा ॥
नि:संगाचा संग सदृढ धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥

================================================
समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान । परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥

================================================

Friday, June 24, 2011

माधव ज्यूलियन यांच्या कविता


माधव जुलियन

(२१ जानेवारी, १८९४ - २९ नोव्हेंबर, १९३९)
माधव जुलियन ( माधव त्रिंबक पटवर्धन ) हे विसाव्या शतकाच्या सुरूवातिला होउन गेलेले मराठीतले अग्रणी कवी असून रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.
व्यवसायाने फारसी आणि इंग्रजी चे प्राध्यापक असलेल्या माधव जुलियन ह्यांना त्यांच्या मराठी कवितेने (उदा. "प्रेमस्वरूप आई", "मराठी असे आमुची मायबोली" सारख्या अजरामर कविता ) अपार प्रसिद्धी मिळवून दिली.
गझला व रुबाई (अनेकवचनः रुबायत. फारसी भाषेतला सुनितांचा एक प्रकार) हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते.
ते सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कर्ते होते व त्या अनुषंगाने त्यांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहीला होता. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सुची समाविष्ठ आहे.
ते शेले व ब्राऊनिंग ह्यांचे चाहते असून ह्या पश्चिमात्य कविंचा त्यांच्या काव्यलेखनावर बरांच प्रभाव होता. शेलेच्या "जुलियन आणि मडालो" वरुनच त्यांनी "जुलियन" हे नांव धारण केले होते.


पुरस्कार आणि गौरव

  • अध्यक्ष, १९३६ जळगाव चे मराठी साहित्य संमेलन.
  • "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापिठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदाना बद्दल भारतातली पहिली डी. लिट.) 

प्रकाशित साहित्य

  • फारसी - मराठी शब्दकोष (१९२५)
  • विरह-तरंग (1926, खंडकाव्य)
  • स्वप्नलहरी (काव्यसंग्रह)
  • सुधारक (१९२८)
  • भाषाशुद्धि-विवेक
  • छंदोरचना (संशोधनात्मक)

प्रसिद्ध कविता

  • कशासाठी पोटासाठी
  • जीव तुला लोभला माझ्यावरी
  • प्रेम कोणीही करीना
  • प्रेमास्वरूप आई
  • मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली 

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥

=========================================
कशासाठी पोटासाठी 


कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी ! 

~माधव ज्यूलियन


बहु असोत सुंदर- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर.... 
बहु असोत सुंदर संपन्न की महा 
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे 
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे 
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा 

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे 
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे 
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले 
भासति शतगुणित जरी असति एकले 
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती 
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती 
धर्म-राजकारण समवेत चालती 
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो 
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा 

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांच्या कविता


फूल ना फुलाची पाकळी


शहाजहानाआधी मेली ख्यालिखुशाली ती त्याची ।
खडा तेवढा ताजमहालच भूषा जी या जगताची ॥
चुकल्या तरुणा ! वेश्याक्रीडन आज तुझें स्मरणांत नसे ।
कालिदासकृत शाकुंतल परि सरस्वतीच्या कंठि असे ॥
खुनी खडयांनी भरले रांजण वाल्ह्याचे फुटले सारे ।
उरलें रामायण तें नटवी श्रीरामा निज आधारें ॥
गोकुळांतल्या चोराचा नच गोपींना आतां त्रास ।
श्रीकृष्णाची गीता उरली द्याया मरत्या उल्हास ॥
गडगडणें, काळोख, विजा हीं गेलीं वळवाच्या मागें!
अन्नब्रह्मची साक्ष तयाची द्याया हें राही जागें ॥
कांटे सुकले फांदीवरतीं - धन त्यांची झाली राना ।
गुलाब देवा, तुम्हा वाहिला, गोड करुनि तो कां घ्याना ॥
दूषण वगळुनि भूषणमात्रे प्रभुपूजन करि काळ असें ।
तुम्ही आम्ही कष्टी होणें हा कुठला मग न्याय असें? ॥
(अनुष्टुम्)
'गोविंदाग्रज' अपीं ही स्वभावें चरणांवरी ।
रसिका, घ्या फूल नाहीं फुलाची पाकळी तरी ॥

===============================================

एकच मागणे !


आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा - हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकालिचे सकळही सव्याज देणें असे ॥1 ॥

आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्बंध नानापरी ।
इच्छा केवळ दु:खदा, अनुभवें हें बाणलें अंतरी ॥
आतां एकच मागणें तव पदी, देवा, असे एवढें ।
संसारी मिळता न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥2 ॥

आतां दु:ख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।
इच्छा वावरती मनांत, तरि हीं केली मुकी तन्मुखे ॥
''जें कांही घडते सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे''
ऐसें जाणुनि सोसण्यास मज ते सध्दैर्य दे तेवढे ॥3॥



================================================

सांग कसे बसलों ?

भेट जहाली पहिल्या दिवशीं

परिचित नव्हतों कुणी कुणांशीं,
लाजुनि तेव्हां परस्परांशीं,
दूर - दूर- बसलों. ॥ 1 ॥

दिवस यापरी जातां चार,
लज्जा उरली नाहीं फार,
त्रास न होतां मग अनिवार -
जवळ जरा - आलों ॥ 2 ॥

यापरि गेले महिनें कांही,
परिचयास मग पार न राही,
लज्जा नुरतां तिळभर पाहीं -
सांग कसे बसलो ? ॥ 3 ॥

==================================================

पहिले चुंबन


जें मनास शिवले नाही । ठावे न कल्पनेलाही। सुख असे।
जे दिसे न कवण्या जागी। जे अवर्ण्य वाणीलागी। सुख असे।
कविताही प्रतिभाशाली। कल्पितां जयातें थकली। सुख असे।
एकदा । कष्टता सदा । पुढति नच कदा- ।
अनुभवा येई । ते पहिले चुंबन देई । सुख असे॥1॥

चित्रासह रमणी बसली। नवयौवन शोभा ठसली। तन्मुखी।
करि ठेवुनी कोमल गाला । करि विचार न कळे कसला। सारखी।
डोले न अथवा हाले । मग कुठले बोले चाले। चित्र ते।
रंजना। मुग्धयौवना। करित कल्पना।
भावी कालाची । (तुज ठावे) त्या दिवसाची। दिवस तो॥2॥

चित्र हे पाहुनी असले । नेत्रांचे सार्थक झाले। वाटले।
परि तरंग अद्भुत उठले। अनुभवा न पूर्वी आले। जे कधी।
जाउनी चोरटया चाली । झाकिले नयन करजाली। न कळता।
संभ्रमे । दचकली गमे। त्वरित विभ्रमे।
श्रमवि कर दोन्ही। काढाया नयनावरुनी । मम करा॥3॥

तो बघुनी उघडया गाला। उन्माद मानसी भरला। स्वैरसा।
संमोह पडे नयनांला। मज विसर जगाचा पडला। क्षणभरी।
ठेवुनी मुख सखीच्या गाली। आणिली गुलाबी लाली। त्यावरी।
हासली। फार लाजली। दूर जाहली।
एक निमिषांत। झिडकारुनी माझा हात। हसतची॥4॥

हा खेळ एक निमिषांचा। एकदाच अनुभव त्याचा । नच पुन्हा ।
ते वारे आले गेले। जन्माचे सार्थक झाले। परि गमे।
ते निमिष, स्थिती ती, सुख ते। चित्ताच्या दृष्टिस दिसते॥ सारखें! ॥
स्वानंद - कमलमकरंद। सुधानिस्यंद।
भूवरी आणी। जे वर्णावे ते कोणी । सुख तसे॥5॥

एकदाच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा। एकदां।
आयुष्य न त्याला क्षणही। जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदा ।
मनि चटका लावायासी। पाठवी दैव जणु त्यासी। एकदा।
निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी।
मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥


=====================================================


एखाद्याचे नशीब

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !



~राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज 

श्री महाराष्ट्र गीत - राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

श्री महाराष्ट्र गीत 
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी  देशा ॥
भावभक्तिच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ॥
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा, ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचतें करीं ॥
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्यासी
वैभवासि वैराग्यासी ॥
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ 1 ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा ! महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या 'जिवलगा' महाराष्ट्र देशा ॥
पाषाणाच्या देहीं वरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा ॥
तुझिया देहीं करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ॥
मंगल वसती जनस्थानिंवी श्री रघुनाथांनी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥2॥

भिन्न वृत्तिंची भन्न भिन्न हीं एक जीवसत्त्वें ।
तुझिया देहीं प्रकट दाविती दिव्य जीवतत्त्वें ।
चित्पावन बुध्दीनें करिसी तू कर्तबगारी ।
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥
कायस्थाचें इमान फिरवी रक्ताचा फेर ।
ठाक मराठी मनभट दावी तुझें हाडपेर ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 3॥

ठायीं ठायीं पांडव लेणीं सह्याद्रीपोटी ।
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिंचाहि ।
लढवय्या झुंझार डोंगरी तूंच सख्या पाही ॥
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल ।
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 4॥

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकाेंडा ।
वहाण पायीं अंगि कांबळी उशाखालिं धोंडा ॥
विळा कोयता धरी दिंगबर दख्खनचा हात ।
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात ॥
आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल ।
तिकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 5 ॥

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक ।
झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ॥
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड ।
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड ॥
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा ।
कोंडाण्याचा करि सिंहगड मालुसरा तान्हा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 6 ॥

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला ।
पहिलावहिला अष्टांगांनीं प्रणाम हा त्याला ॥
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकांच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा ॥
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा ।
वाल्मिकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 7 ॥

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा ।
कवि कृष्णाच्या* निर्यमका हे महाराष्ट्र देशा ॥
*केशवसुत.
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ ।
तिथेंच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ ॥
जिथें रंगलीं साधींभोळीं जनाइचीं गाणी ।
तिथेंच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .... ॥ 8 ॥

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी ।
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी ..
तुला जागवी ऐन पहांटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ ॥
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी ।
उभा टाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥ 9 ॥

प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला ।
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला ॥
भीमथडीहुनि चहुंमुलखांवर फिरले धारकरी ॥
भीम थडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी ।
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धांव ॥
पुंडलिकांचें नांव चालवी दगडाची नाव ॥
गोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक ।
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ..... ॥ 10 ॥

(अपूर्ण )
~राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

सागरा प्राण तळमळला-स्वातंत्रवीर सावरकर


सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

- विनायक दामोदर सावरकर
मी मराठी 
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्मपंथजात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते 
मराठी

~
सुरेश भट

ती फुलराणी -बालकवी


ती फुलराणी ....


हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती, फ़ुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचल त्या भृलीला, अवगत नव्ह्त्या कुमारीकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फ़ुलराणीला?
पूरा विनोदी संध्यावात, डोल दोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फ़ुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतुन, हळूच पहाते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला?"
लाज लाजली ह्या वचनांनी, साधी भोळी ती फ़ुलराणी 

आंदोळी संध्येच्या बसूनी, झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टॊणा त्यांनी केला, चैन पडेना फ़ुलराणीला
निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फ़ुलराणी ही, आज कशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फ़ुलराणीला
या कुंजातून त्या कूंजातून, इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन
प्रणय चींतनी विलीन वॄत्ती, कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फ़ुलराणी

कुणी कुणाला अवकाशांत, प्रणयगायनें हॊतें गात;
हळूच मागुनी आले कॊण, कुणी कुणा दे चुंबनदान?”
प्रणय खेळ हे पाहुन चित्तीं, विरहार्ता फुलराणी हॊती;
तॊं व्यॊमींच्या प्रेमदेवता, वार्‍यावरती फिरतां फिरतां-
हळूच आल्या उतरुन खालीं, फुलराणीसह करण्या खेळी.
परस्परांना खुणवुनी नयनीं, त्या वदल्या ही अमुची राणी?
स्वर्भुमीचा जुळवीत हात, नाच नाचतो प्रभात वात
खेळूनी दमल्या त्या घ्रह माला, हळुच लागती लपावयाला
आकाशाची गंभिर शांती, मंद मंद ये अवनी वरती
विरू लागले संशय जाल, संपत ये विरहाचा काल

शुभ्र धुक्ल्याचे वस्त्र लेऊनी, हर्षनिर्भरा नटली अवनी 
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीही अजुनी फ़ुलराणी ती,

तेजोमय नव मंडप केला, लक्ख पांढरा दाही दिशांना,
जिकडे तिकडे उधळीत मोती, दिव्य वर्‍हाडी गगनी येती,
ला सुवर्णी झगे घालूनी, हासत हासत आले कोणी,
कुणी बांधीला गुलाबी फ़ेटा, झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोल चालला, हा वाड्निश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फ़ुलराणीचे,
गाऊ लागले मंगल पाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुत राणा, कोकिळ घे तानावर ताना,
नाचू लागले भारद्वाज, वाजवीती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फ़ुलराणी सुंदर,
लग्न लागते सावध सारे, सावध पक्षी सावध वारे,
दवमय अंत:पट फ़िटला, भेटे रविकर फ़ुलराणीला,

वधू वरांना दिव्य रवानी, कुणी गायीली मंगल गाणी,
त्यात कुणीसे गुंफित होते, परस्परांचे प्रेम अहा ते,
आणिक तेथील वनदेवीही, दीव्य आपुल्या उच्छ्वासांनी,
लिहीत होत्या वातावरणी, फ़ुलराणीची गोड कहाणी,
गुंगत गुंगत कवी त्या ठायी, स्फ़ुर्ती सह विहराया जाई,
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फ़ुलराणीला,

- बालकवी

श्रावण मासी -बालकवी


श्रावण मासी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे


उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे


मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
~बालकवी