Showing posts with label आरती प्रभू. Show all posts
Showing posts with label आरती प्रभू. Show all posts

Sunday, August 7, 2011

आरती प्रभु

सेवेकरी मुद्रा असों नये बाशी
पहाटेस नेमें कातरावी मिशी

फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेची प्रीत सेकंदांशीं तोल

नको उमटाया स्तनावर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

कानाच्या भोकाशीं फक्त लाव फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणार घाम
घाल आंतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यांतली वांती गळ्यांत ठेवून
पिंकदाणीतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकिल्या श्वासां लाव नाक
कण्यासही हवे किंचीतसे पोक

सहीस जाताना मालवावी छाती
भ्रांतींत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती

नको पाहूं दूर भ्रमातला प्रांत
तुझ्या पायांसाठी कचेरीची वाट

~आरती प्रभु
७.०६.६०

Monday, July 11, 2011

आरती प्रभू



आरती प्रभू 


ज्येष्ठ मराठी लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांचा २६ एप्रिल हा स्मृतिदिन.
  


कवी आरती प्रभू किंवा लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या 
उल्लेखाशिवाय मराठी साहित्याचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही. 
चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला.
 वडिलांचे छत्र लहानपणीच गेल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते.


आरती प्रभूंचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बेफिकीरप्रवृत्ती आणि धंद्यातील स्पर्धा यामुळे त्यांचा खाणावळीचा धंदा बसला. देणेक-यांची देणी वाढली. घरातील एकेक वस्तू विकून दिवस कंठण्याची वेळ आली. अशा आर्थिक ओढगस्तीमुळे खानोलकर त्रस्त झाले होते. शाळेत असल्यापासून खानोलकर आरती प्रभू या नावाने कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. खानोलकरांनी आपली हालाखीची स्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली आणि एक दिवस अचानकपणे ते मुंबईत येऊन दाखल झाले.

कोकणात निसर्गाच्या सानिध्यात राहणारे खानोलकर मुंबईत मनापासून कधीच रमले नाहीत. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला दिसतो. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. याच दरम्यान त्यांची आकाशवाणीतील भाषण विभागात पाडगावकरांचा असिस्टंट म्हणून नेमणूक केली.

खानोलकरांचा जीवनपट म्हणजे नियतीचा सारीपटच होता असे म्हणावे लागेल. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात , असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत , मंगेश पाडगांवकर , मधु मंगेश कर्णिक , विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे येतात आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ ये रे घना ’, ‘ नाही कशी म्हणू तुला ’ सारखी गीते अमर होतात.

सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी ’ सारखी कादंबरी लिहितो आणि हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळवतो. ‘ अजगर ’सारख्या कादंबरीवर अत्र्यांसारख्याचे आसूड खातो. पुढे ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला अंत्र्याकडून शाबासकीही मिळवतो. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘ एक शून्य बाजीराव ’ सारखे नाटक लिहितो आणि रंगायनसारखी संस्था ते रंगभूमीवर आणते. एक इतिहास घडतो. ‘अवध्य ’ सारख्या नाटकातून रंगभूमी गाजवतो आणि मराठी नाटक वयात आल्याची ग्वाही माधव मनोहरांसारखा व्यासंगी समीक्षक मुक्तमनाने देतो. कोंडूरा कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला टाकवून टाकतो आणि त्यावर चित्रपट काढावा असे त्याला वाटते. व्ही. शांतारामासारख्यांना चानी मोहात टाकते. अजब न्याय वर्तुळाचा जर्मनीपर्यंत पोहचते आणि नाट्यसृष्टीत एक चमत्कार घडतो.

८ मार्च १९३० रोजी कोकणच्या भूमीवर अवतरलेले नियतीच्या पटावरचे हे प्यादे २६ एप्रिल १९७६ पर्यंत अनेक चौकोनातून फिरत वेगवेगळ्या चालीने संचार करीत अखेर नियतीने पटाबाहेर नेले.

- अमिता जामखेडकर
(पुनर्मुद्रीत)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर 

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (८ मार्च, इ.स. १९३०- २६ एप्रिल, इ.स. १९७६)
मराठी कवी, लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत.
तेथे गल्ल्यावर बसुन खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही
मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने
'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित
झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती कि अचानक मिळालेल्या या प्रसिध्दीमुळे आपली प्रतिभा,
आपल्याला मिळालेली शब्दांची हि देणगी आपल्या हातुन निसटुन तर जाणार नाहीना.
पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधना पर्यंत मराठी
साहित्य सॄष्टीत तळपतच राहिला.
प्रकाशित साहित्य 

  • गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
  • कोंडुरा (कादंबरी, १९६६)
  • अजगर (कादंबरी, १९६५)
  • रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
  • त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
  • आपुले मरण
  • जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
  • दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
  • नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
  • पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
  • पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
  • सनई (कथा संग्रह, १९६४)
  • राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
  • चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
  • एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
  • सगेसोयरे (नाटक, १९६७)
  • अवध्य (नाटक, १९७२)
  • कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
  • अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
पुरस्कार 
१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार "नक्षत्रांचे देणे " साठी 

अंत झाला अस्ता आधी,जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे 


कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ? 

कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
~आरती प्रभू